*गडचिरोलीच्या विविध प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी डॉ. देवराव होळी यांची सविस्तर चर्चा; रानटी हत्तींचे पुनर्वसन, मत्स्यशेती प्रकल्प व राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावर केली कारवाई ची मागणी*
गडचिरोली, प्रतिनिधी : भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. यावेळी विविध विकासकामे, वन्यजीव व्यवस्थापन, रोजगारनिर्मिती तसेच राष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
माजी आमदार डॉ. होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आलेल्या रानटी हत्तींमुळे नागरिकांच्या जीवित व शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या हत्तींचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना गडचिरोली जिल्ह्याबाहेर स्थलांतरित करण्यासाठी शासनाने तातडीने स्थायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने गोड्या पाण्यातील झिंगा (Freshwater Scampi) तसेच इतर उच्च मूल्याच्या मत्स्यप्रजातींच्या संवर्धनासाठी विशेष पायलट अभिनव मत्स्यशेती प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. या प्रकल्पासाठी शासनाच्या ताब्यातील अधिग्रहित जमीन नाममात्र दराने दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्याची विनंती माजी आमदार डॉ. होळी यांनी केली.
तसेच, गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 353C व 130D च्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, काम पूर्ण होण्यास होणारा विलंब आणि वारंवार होणारे अपघात ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करून त्याचा परवाना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावा तसेच उर्वरित कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी सादर करण्यात आलेल्या निवेदनातील सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.


