गडचिरोली टाइम्स दि.१७जुलै:गोंडवाना विद्यापीठाच्या एसटीआरसी अंतर्गत ‘चौपाल’ कार्यक्रमाचे आयोजन..
गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC), ॲडिशनल डेव्हलपमेंट कमिशनर (हँडीक्राफ्ट), मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स, भारत सरकार आणि सृष्टी फाउंडेशन, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा तालुक्यातील येरंडी येथे दुसऱ्या ‘चौपाल’ कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन कुरखेडा चे नायब तहसीलदार वैभव आंबेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डेव्हलपमेंट कमिशनर (हँडीक्राफ्ट), कार्यालयाचे अतिरिक्त संचालक अवधेश ठाकूर, हँडीक्राफ्ट प्रोमोशन ऑफिसर, दिलीप कुमार, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख, स्वप्निल गिरडे, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कुरखेडा, कोरची व वडसा परिसरातील कारागीर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश rआर्टिसन कार्डचे महत्व कारागीरांपर्यंत पोहोचविणे, योजने अंतर्गत मिळणाऱ्या शासकीय लाभांची माहिती देणे आणि प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेबाबत मार्गदर्शन करणे हा होता. यासोबतच डी. सी. हँडीक्राफ्ट (डेव्हलपमेंट कमिशनर हँडीक्राफ्ट) मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स, मार्फत कारागिरांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामुळे कारागिरांना विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन मिळाले .
याशिवाय, या कार्यक्रमात ८५ कारागिरांनी सहभाग नोंदविला. उपस्थित कारागिरांकडून आर्टिसन कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्वीकारून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे अधिकाधिक कारागिरांना राष्ट्रीय स्तरावरील ओळख आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला.
यावेळी नायब तहसीलदार वैभव आंबेकर यांनी कारागिरांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच उपलब्ध संधींचा प्रभावीपणे उपयोग करून स्वावलंबी होण्याचे आवाहन करत, आवश्यक तेथे प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अवधेश ठाकूर यांनी कारागिरांना आर्टिसन कार्डचे महत्त्व, त्याद्वारे मिळणाऱ्या सुविधा, बाजारपेठेशी जोडणीच्या संधी तसेच मुद्रा कर्ज योजनेद्वारे उपलब्ध होणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबत सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमाकरिता सृष्टी फाउंडेशन चे संचालक केशव गुरनुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आयोजित संवाद सत्रात कारागिरांनी विविध प्रश्न विचारले, ज्यांना उपस्थित तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.
ग्रामीण व आदिवासी भागातील कारागिरांना शासकीय योजनांशी जोडून त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या दिशेने एसटीआरसी चा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, येरंडीतील कार्यक्रमाला कारागिरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


